Wednesday, June 5, 2019

आनंदवन

मानव निर्मित खूप मोठं खूप प्रचंड बघण्याचा पहिला अनुभव मला आयफेल tower बघितला तेव्हा आला , म्हणजे माणूस इतका अफाट इतका मोठा विचार करू शकतो ? दुसरा अनुभव बाबा आमटे ह्यांच्या आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पांना भेट दिली तेव्हा आला . म्हणजे साधारण माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडील आहे सगळं .  दोघान मधला एक मोठा फरक म्हणजे, एक कृत्रिम आहे आणि त्याचा आकार तेवढाच राहील आणि दुसरा माणसांनी जोडलेला बांधलेला आणि वाढतच जाणारा अविरत ... 

नुसतं पाहिलं कि  भारावून जातो आणि मग तिथली माणसं आपल्याला काही माहिती देतात फिरवून आणतात तेव्हा तर बाबा आमटे ह्या उत्तुंग माणसाच्या कामाचं खर स्वरूप दिसत, कळत . तिथली सगळीच माणस  इतकी शांत आणि प्रेमळ आहेत तस पाहायला गेल तर हल्ली रोज  एक ग्रुप तिथे येतो, पण सगळीकडे त्या कार्यकर्त्यांनी त्याच जोमाने अनु उत्साहाने सगळं सांगितलं आणि अस ते अनेक वर्ष करत आहेत  आणि करत राहतील . employee satisfaction वगैरे म्हणेज हेच असेल. 

आनंदवन :  मला आनंदवन नक्की कुठे आहे हे ठाऊकच न्हवत, आमटे कुटुंबा, बद्दल आनंदवन बद्दल तस  खूप माहिती होत पण आहे कुठे? नागपूर जवळ हे एवढच , मग जंगलात आहे का?आजूबाजूला काही असेल का? वगैरे सगळे स्वप्न रंजीत संकल्पना मी डोक्यात बांधल्या , नेट वर शोधल तेव्हा असं लक्षात आलं कि गाईडेड टूर्स असतात , इथून नागपूर मग तिथून त्यांची गाडी दोन तासावर आनंदवन मग तिथून हेमलकसा आणि सोमनाथ मग परत नागपूर. पण मला हे टुरिस्ट सारखं करायच न्हवत म्हणून चार लोकांना चार वेळा (दिवसातून ) फोन करून माझा मी आलो .  तर आनंदवन च्या सगळ्यात जवळच स्टेशन म्हणजे वरोरा इथे तुम्ही नागपूर हून बस ने किव्हा गाडी करून येऊ शकता . म्हणजे नागपूर ला दुरोन्तो ने उतरून मग तिथून गाडी करून पुढे, किव्हा सेवाग्राम ने थेट वरोरा ला  उतरून येऊ शकता फार तर एक किलोमीटर अंतर असेल वरोरा पासून  . फक्त सेवाग्राम दुपारी ३ ला सुटते आणि दुरोन्तो रात्री ८. सेवाग्राम खूप ग्रामांची सेवा करते त्या मुळे रटाळ होत, पण नागपूर ते वरोरा चा खर्च वाचतो.  आनंदवनात राहायची सोय झाली नाही तर दोन चार हॉटेल्स ही आहेत जवळ पास.

बुधवारी आनंदवन बंद असतं म्हणजे वरोरा बंद, त्या मुळे आतले सगळे उद्योग बंद असतात .... काय काय उद्योग करतात ते आम्हाला आत फिरल्यावर समजलं . खूप मोठा परिसर आहे, सगळं स्वच्छ , झाड लोट करताना माणसं सुद्धा फार दिसत नाहीत पण शिस्त आणि स्वच्छता अंगवळणी पडलं आहे इथल्या रहिवाश्यांच्या. साधारण लोकांची कल्पना अशी असते कि आनंदवन म्हणजे सगळे कुष्ठरोगी इथे तिथे फिरत असतील , तर असं अजिबात नाहीये, ज्यांना ट्रीटमेंट ची गरज आहे ती दवाखान्यात असतात त्यांच्या कुटुंबाला राहायची सोय आहे . बरेचदा नातेवाईकांनी म्हणजे अगदीच सख्यांनी टाकलं असत , ते बरे होई पर्यंत इथेच असतात आणि नंतर इथेच काम सुद्धा करतात . बरे झालेले  रुग्ण अगदी ताठ मानेने इथे फिरत असतात . आपल्या संकल्पना सगळ्या उधळवून लावत ती लोक आपल्या डोळ्यात डोळे घालून नमस्कार करतात, हसतात , बाहेरच्या जगात ही लोक अगदीच दिन वगैर दिसतात पण आनंदवनात खूप वेगळं चित्र आहे , इतका सम्मान मिळालेला दिसतो कि खरंच अस वाटतं कि आपण एका माणसाला जरी पायावर उभं करू शकलो तरी किती केलं असं होईल, इथे तर शेकडो माणस  आपल्या पायावर पुन्हा उभी झाली , पडलेल्या माणसाला उभ करणं खूप कठीण, इथे तर पिढ्याच्या पिढ्या परत उभ्या केल्या आहेत.

बाहेरच्या लोकांची जेवायची उत्तम सोया आहे आणि एक म्हणजे आपणच आपलं ताट वाट्या धून लागतात, कुणी  मोठं नाही कि लहान नाही सगळे सेम. सगळ्यांना एक चक्कर मारून आणली आनंदवनाची, नाव सार्थक करणारी लोक तिथे आहेत, सगळेच आनंदी दिसतात किव्हा आपण ज्याला इंग्रजीत "content" तशी आहेत लोक, आपल्या मुंबईत सगळी लोक ट्राफिक मुळे , गाडीतल्या गर्दी मुळे म्हणा, एकूणच फार कवलेली दिसतात, पण इथे सगळी लोक आनंदीच  दिसतात.

गुरुवारी आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा तिथे एक फिल्म दाखवत होते, म्हणजे जनरल असं, माहितीपट. ती फिल्म बघून बाहेर आलो आणि बाजूला असलेल्या ग्राम उद्योगाच्या दालनात शिरलो. सगळं काम हाताने केलेलं, ग्रीटिंग कार्ड्स होते चित्र होती. दुसरी कडे गेलो तर तिथे कोरीव काम केलेल्या वस्तू होत्या. जुन्या टाकाऊ वस्तूं पासून सुद्धा किती गोष्टी केल्या होत्या. काय कलाकारी, आपण थक्क होतो. तिथे पु लंनी (पु ल देशपांडे) लावलेले एक झाड आहे , आता वटवृक्ष झालाय म्हणा (होणारच, त्यांनी हात लावलेलं प्रत्येक पण फुलतंच), आणि  विकास आमटे म्हणाले कि पु ल न चुकता दर वर्षी येऊन जायचे, म्हणजे त्यांना झेपत होत तो पर्यंत, शेवटची चार पाच वर्ष सोडून आणि मदतीचा हात कायम पुढे, तरी पु लंच्या एकाही लिखाणात त्यांच्या मदतीचा उल्लेख आहे का? देणार्याने देत राहावे .... त्या दोघा दोस्तांचे फोटो आहेत खूप, मी साष्टांग नमस्कार घालणार होतो, पण मोह टाळला.  इतकी मोठी माणसं आपल्याच राज्यात असल्याचा अभिमान वाटला, नकळत छाती फुगली आणि डोळे आपोप भरून आले...दिपलेच म्हणा.   बाबांना माणूस म्हणायचं कारण म्हणजे ते देव, दैवत ह्या पासून दूर राहिले, कोणत्या माणसाला जात बघून ट्रीटमेंट नसते इथे, आणि बर झाल्यावर धर्माच बंधन नाही. इथे धर्मशाळा आहे का? अस कुणीतरी विचारलं तेव्हा विकास आमटे म्हणाले कि इथे धर्मच नाही धर्म शाळा कशी असणार? इथे या आणि राहा, मदत करा ... आनंदवन हेमलकसा, सोमनाथ, कुठेहि देऊळ नाही कि देव नाही ... देव पणा सुद्धा नाही.. आपण देव शोधतो माणूस शोधायला हवा ..  लगेच सापडेल.

पुढे मग हातमागाचे काम चालू होती. सतरंज्या चादरी, गालिचे, सगळंच. तिथे पाठीच बाबा आमटे आणि साधना ताई ह्यांची समाधी आहे, छान झाड आहेत. मला जाळताना झाड नका कापू म्हणाले, काय बोलायचं? आणि साधना ताईंची समाधी तिथेच शेजारी. पाठी राखीण म्हणजे काय? ह्याचा उत्तम उधाहरण हि सगळीच आमटे फॅमिली, म्हणजे इतक्या उत्तुंग माणसाला जपणं त्यांच्या कार्यात बरोबरीने आणि काही वेळा जास्त सहभाग देणं हि खूप कठीण गोष्ट असते, एखाद्या माणसाला एका गोष्टीचा ध्यास लागतो, पण त्यांच्या साथीदाराने फक्त त्या माणसाचा ध्यास असून वाट्टेल ते पणाला लाऊन  नवराच्या यशा मध्ये समाधान मानणं हे असामान्य आहे. तिथे समाधी वर मात्र मी आणि सगळ्यांनीच डोकं टेकलं, नतमस्तक होण्या सारखंच आहे ते ..

तिथे त्या रहिवाश्यांचं कॅन्टीन आहे, म्हणजे जिथे लोक जेवतात, आम्हाला ते पाहायला घेऊन गेले. स्वच्छ, नीट नेटकं , खूप प्रमाणात पोळ्या भाकऱ्या केल्या जातात, भाजी असते , आमटी , कोशिंबीर सगळं. भाज्या इथल्याच काही धान्य लागलं तरच बाहेरून. भाज्या चिरल्या कि त्याच साल म्हणा , टरफल म्हणा सगळं ते प्रोसेस करून बायो गॅस, आधी सांगितल्या प्रमाणे बुधवार सगळं बंद असत, तेव्हा इथे बाजार भरतो. तो सगळा ओला कचरा आणून बायो गॅस केला जातो, सोलार पॅनल आहेत .... १०० टक्के उपयोग, स्वावलमभन,  स्वाभिमान , सम्मान..

त्यांच्या सगळ्या वस्तू आहेत ते विकायला दुकान आहे इथे, छान आहे, कष्ट करून पैसा कमवा, साधं सोपं सरळ. मग समोर आपल्या साठी जेवणाची जागा आहे, तुम्ही ताट वाट्या घ्या, अन्न वाढून घ्या, परत घासून जागेवर ठेवा. साधा सोपं करून ठेवलय, आपण फॉरेन मध्ये बघतो तस आहे सगळ, सगळ्यांना सेम वागणूक, काम वाटून दिलेली सगळी जण सगळी काम करतात.

आम्ही मग जेऊन हेमलकसा चा प्रवास सुरु केला ... अजून एक दिवस तरी थांबायला हवं असं वाटत होत .. काय नवल आहे, आपण रिसॉर्ट ला सुद्धा कंटाळतो, इथे तस करमणूकी साठी काही नसताना माणूस रमतो .. धन्य आहे सगळ बाबा  ....

No comments: